पिळदार मिशा आणि मजबूत शरीरयष्टीचे अण्णासाहेब पाटील कष्टकऱ्यांचे दैवत आणि मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी लढलेले लढवय्ये नेतृत्व म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. पाटण तालुक्यातील मंद्रुळकोळे या छोट्याशा गावात गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अण्णासाहेबांना त्यांच्या मातोश्रींनी उपजतच परिश्रमाचे बाळकडू पाजले होते. कमी शिक्षणामुळे मेहनतीच्या कामाशिवाय पर्याय नसल्याने सुरुवातीला त्यांनी मुंबईत उसाच्या घाण्यावर काम केले.
त्यानंतर लाकडाच्या वखारीत मजूर म्हणून नोकरी पत्करली. त्याकाळी कामगारांची मालकांकडून होणारी पिळवणूक सहन न झाल्याने साताऱ्याच्या मातीतल्या या धाडसी नेतृत्वाने कष्टकऱ्यांच्या मनामनात आपल्या हक्कांसाठी अन्यायाविरोधात लढण्यासाठी प्रज्वलित केलेली ठिणगी पुढे मशाल बनली. तिच्या तेजात तमाम कष्टकऱ्यांचे जीवन उजळून निघाले.
मराठा समाजाची अशी कोणतीही प्रबळ संघटना नव्हती. १९८० च्या दशकात अनेक मराठा तरूण माथाडी कामगार म्हणून कार्यरत होते. अण्णासाहेब पाटील यांना ही स्थिती लक्षात आली. त्यांनी छोट्या-छोट्या मंडळांची मोट बांधून मराठा महासंघाची स्थापना केली. राज्यभर झंझावती दौरे केले. आरक्षणासाठी मुंबईत २२ मार्च १९८२ रोजी मोर्चा काढला. त्यावेळचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसलेंनी आरक्षणाची मागणी मान्य केली. पण दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटील यांचे निधन झाले.