कारखाना चालवणारा माणूस म्हणून राज्यभर ओळख
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यावर राज्य सहकारी बँकेने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने साखर सम्राटांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारण विठ्ठल चे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांना बंद पडलेले साखर कारखाना चालवणारा माणूस म्हणून ओळखले जाते.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने राज्य सहकारी बँकेकडून वेळोवेळी घेतलेल्या कर्जाची व्याजासह परतफेड केली नसल्याने या साखर कारखान्यास राज्य सहकारी बँकेने कायदेशीर नोटीस दिली होती. सदर नोटीस दिल्यानंतरही कारखान्याच्या संचालक मंडळाने आज अखेर पर्यंत थकीत २५२ कोटी ४९ लाख कर्ज व त्यावरील व्याज १७७ कोटी ६८ लाख रुपयाच्या रकमेचा कुठलाही भरणा केला नाही. कारखान्याने गळीत हंगामात उत्पादित केलेल्या साखरेवर प्लेज करारानुसार ८०० रुपये टॅगिंग करीत सदर रक्कम बँकेत भरणा करणे गरजचे होते. सण २०२२-२३ च्या गाळप हंगामात कारखाण्याने उत्पादित साखरेपोटी ५३ कोटी १५ लाख रुपये बँकेकडे भरणा करणे गरजेचे असताना सदर रक्कम भरली नाही तसेच सहवीजनिर्मिती व इथेनॉल प्रक्लपातून मिळालेल्या उत्पन्नातून बँकेस कुठलाही भरणा न केल्याने कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे व सर्व संचालकांवरकलम ४०६,४२०,४२१ आदीनुसार गुन्हे दाखल करावेत असे पत्र राज्य सहकारी बँकेचे प्राधिकृत अधिकारी कैलास घनवट यांनी पंढरपुर ग्रामीण पोलीस ठाण्यास दिले आहे. आर्थिक अडचणीमुळे विठ्ठल कारखान्यास दोन वेळा गळीत हंगाम बंद ठेवावा लागला होता. राज्य सहकारी बँकेने थकीत कर्ज व व्याज या पोटी भरना न केल्याणे थेट पोलीस कारवाई करण्याचा बडगा उचलला आहे.