डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात गेल्या सहा महिन्यांत एकदाही जंतुनाशक फवारणी आणि धुरीकरण झाले नसल्याचे दिसत असून डासांचे प्रमाण भयानक वाढले आहे. डेंग्यू, मलेरिया, टायफड इत्यादी रोगांचे प्रमाणात वाढ झाली असून येथील डॉक्टरांच्या दवाखान्यात या रुग्णांची वाढ झाल्याचे दिसत आहे.
दवाखान्यात येणाऱ्या दहा रुग्णपैकी दोन रुग्ण हे डेंग्यूचे असल्याचे दिसत असल्याचे स्थानिक डॉक्टरांचे म्हणणे आहे. केडीएमसी कडून जंतूनाशक फवारणी आणि धूरीकरण करण्यात येते परंतु येथील स्थानिक रहिवाशांनी असे फवारणी व धूरिकरण गेले कित्येक दिवस झाले नसल्याचे सांगितले जात असून आम्ही केडीएमसीचे टॅक्स नियमित भरून सुद्धा आम्हाला ही अत्यावश्यक सेवा केडीएमसी कडून मिळत नाही आहे.
अनेक पावसाळी गटार मधून पाणी निचरा होत नसल्याने ते कित्तेक दिवस साचून राहत आहे. याला मुख्य कारण चुकीची/अर्धवट बांधण्यात आलेली नवीन गटारे हे होय. तसेच सांडपाणी ( Drainage ) वाहिन्या अनेक ठिकाणी फुटल्याने त्यातून सांडपाणी उघड्यावर वाहत असल्याचे दिसत असते. या सर्व कारणांमुळे त्यात डासांची व इतर किडे/कीटक यांची पैदास होण्यास हे कारणीभूत ठरत आहेत.
अनेकदा नागरिकांकडून तक्रारी करून सुध्दा त्याची दखल घेतली जात नाही आहे. मिलापनगर तलावाकडे त्याची नियमित साफसफाई करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. तलावाचा चारी बाजूला घाणीचे साम्राज्य पसरले असून हा तलाव आहे का डबके आहे असा प्रश्न पडला आहे. सदर तलाव हा डासांची उत्पत्ती अंडी घालण्यासाठी एक जागा तयार झाली असून यात डासांची अंडी खाणारे गप्पी मासे सोडावेत आणि नियमित साफसफाई करावी अशी स्थानिक रहिवाशांकडून मागणी होत आहे. जर यापुढे केडीएमसी कडून स्वच्छतेबाबत अशीच टाळाटाळ करण्यात आली तर येथील नागरिक मालमत्ता कर न भरण्याबाबत गांभीर्याने विचार करतील.
प्रतिनिधि/भानुदास गायकवाड़