प्रतिनिधी / भानुदास गायकवाड
डोंबिवली एमआयडीसी भागात
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही अद्याप सर्व नाले, गटारी यांची सफाई झाली नसल्याने त्यात काँक्रीटीकरण मुळे रस्त्यांची उंची वाढल्याने नक्कीच यावर्षी पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होणार आहे. एमआयडीसी मधील मोठे नाले हे केडीएमसी कडून साफसफाई करण्यात येतात तर पावसाळी पाणी वाहून नेणारी छोट्या गटारी हे एमआयडीसी कडून साफसफाई करण्यात येतात.
एमआयडीसी निवासी आणि औद्योगिक भागातील काही मोठे नाल्यांची सफाई अद्याप झाली नसल्याचे तर काही मोठे नाले यांची वरवरचा कचरा काढून दिखाऊ नाले सफाई केली आहे. DNS बँक मुख्य शाखा ते अभिनव विद्यालय कडे जाणारा नाला, एमआयडीसी सर्व्हिस रोड/कल्याण शिळ रोड मधून जाणारा नाला, उस्मा पेट्रोल जवळून जाणारा नाला असे अनेक औद्योगिक आणि निवासी भागातील नाले यांची साफसफाई झालीच नसल्याचे एकंदर पाहणीत आढळून आले आहे. एमआयडीसी निवासी मधील मध्यवर्ती असा कावेरी नाल्यांची साफसफाई करण्यात आली पण तीही नीट करण्यात आली नाही. हाच नाला पुढे आजदे गावात काही अनधिकृत बांधकामांमुळे अगदीच छोटा होऊन गेला आहे. याच नाल्याची व इतर नाल्यांची मे महिन्याचा सुरवातीला पूर्वपाहणी स्थानिक आमदार राजु पाटील यांनी केली होती. तेव्हा केडीएमसी आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांना स्थानिक रहिवाशांनी आणि आमदारांनी फैलावर घेऊन जाब विचारला होता. तेव्हा उपस्थित अधिकाऱ्यांनी नाले सफाईची कामे मे महिना अखेरपर्यंत पूर्ण होतील अशी आश्वासने दिली होती.
एमआयडीसी मधील छोटी पावसाळी गटारे ही एमआयडीसी कडून साफ करण्यात येतात. मागील वर्षी काही गटारे नवीन बनविण्यात आली होती. सदर ती गटारे एमआयडीसी कडून अर्धवट, चुकीचा पद्धतीने बांधण्यात आली आहेत. जी जुनी गटारे आहेत ती काही ठिकाणी तुटलेली, बुजलेली आहेत. मिलापनगर, सुदर्शननगर, सुदामानगर, चैतन्यनगर या निवासी मधील भागात या पावसाळी गटारांचे पाणी वाहून जाताना अनेक मोठ्या समस्या निर्माण होणार आहेत हे नक्की.
नाले, गटारी साफसफाईची कंत्राट घेणारे ठेकेदार हे राजकीय नेत्यांचे समर्थक असतात. ते अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून त्यातून मोठा आर्थिक फायदा करून घेत आहेत. हे ठेकेदार करोडो रुपयांची बिले थातूरमातूर नाले साफसफाई करून घेत असतात. हे जनतेचे म्हणजेच आपले पैसे आहेत. कल्याण डोंबिवली मधील नाले सफाईची सखोल चौकशी एखाद्या त्रयस्थ तपास यंत्रणेने राजकीय दबाव झुकारून केली तर त्यातून बऱ्याच धक्कादायक गोष्टी बाहेर येतील यात शंका नाही. येणारा पावसाळा एमआयडीसीकरांसाठी नक्कीच मोठ्या समस्या निर्माण करणारा आहे.