अवकाळीने शेतकरी दुहेरी संकटात.
मोखाडा प्रतिनिधी:सौरभ कामडी
मोखाडा. ता. - पालघर जिल्ह्यात गेली आठवडाभरापासुन विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रब्बीचे पीके, फुलशेती, फळबागा, आणि विटभट्ट्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे सुरू आहेत. मार्च महिन्यात खरीपाच्या मशागतीला सुरूवात झाली होती. मात्र, राब भाजणीच्या हंगामात पाऊस कोसळ्याने, गवत, कवळ्या आणि पालापाचोळा हे राब भाजणीचे साहित्य भिजले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
अवकाळी पावसाने पालघर जिल्ह्यात 15 मार्च पासुन सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या विविध भागात रोजच पाऊस कोसळत आहे. काही भागात मेघगर्जना, वादळ तसेच गारपीठ होऊन मुसळधार पाऊस कोसळला आहे. त्याचा मोठा परिणाम फुलशेती, फळबाग आणि रब्बी पीकांवर झाला आहे. फुलशेती, फळबागा आणि रब्बीचे पीके अनेक भागात जमीनदोस्त झाल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विटभट्टी चा व्यवसाय आहे. या विटभट्ट्यांचा अवकाळीने अक्षरशः चिखल केला आहे. त्यामुळे शेतकर्यांसह विटभट्टी व्यवसायीकांचे कंबरडे मोडले आहे. त्यांना मोठे आर्थिक नुकसान सर्वानाच सोसावे लागले आहे.
दरम्यान, शासनाने शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, कर्मचारी संपाने ते सात दिवस रखडले होते. आता कर्मचारी पुन्हा कामावर हजर झाल्याने, पंचनामे करणे सुरू झाले आहेत. आता शेतकर्यांना आर्थिक मदतीची प्रतिक्षा आहे. मात्र, आर्थिक नुकसान झालेले विटभट्टी व्यवसायीक वार्यावरच आहेत. तयार विटभट्टी व कच्चा माल वाचवण्यासाठी, त्यावर प्लास्टिकचे आवरण टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न विटभट्टी चालक करत आहेत.
गेली आठवडाभरापासुन विविध ठिकाणी कोसळलेल्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाने खरीप हंगामाच्या मशागतीला ही ब्रेक लागला आहे. मार्च महिन्यात खरीपाच्या मशागतीला सुरूवात झाली होती. राब भाजणीची शेतकर्यांनी लगबग सुरू होती. पालघर जिल्ह्यात खरीपाचे 1 लाख 5 हजार हेक्टर लागवडीचे क्षेत्र आहे. यामध्ये सर्वाधिक 75 हजार हेक्टर क्षेत्र भात पीकाचे आहे. भाताची, नागली आणि वरई चे रोपे तयार करण्यासाठी, प्रतिवर्षी पारंपारिक पद्धतीने शेतकरी राब भाजणी करतात. त्यासाठी शेतकरी गवत, झाडाझुडपांच्या कवळ्या आणि पालापाचोळा गोळा करतात. जमीन खरपूस भाजून निघून रोपे बहरावी यासाठी शेतकर्यांची ही धडपड असते.
अनेक भागात गोळा केलेले हे राब भजणीचे साहित्य अवकाळीने भिजले आहे. अवकाळी पावसाने शेतकर्यांची राब भाजणी चे साहित्य गोळा करण्याची मेहनत आणि खर्च वाया गेला आहे. येथेही शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे. रब्बीचे पीके, फुलशेती आणि फळबागांच्या नुकसानी सह खरीप हंगामापुर्वीची मशागत ही वाया गेल्याने, पालघर जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
कोट.....
1) खरीप हंगामासाठी राब भाजणी चे काम सुरू केले होते. त्यासाठी गवत, पालापाचोळा गोळा केला आणि झुडपांच्या कवळ्या तोडुन आणल्या होत्या. भाजणी ची संपुर्ण तयारी झाली होती. मात्र, आठवड्यापासून रोजच पाऊस येत असल्याने, हे सर्व साहित्य भिजले आहे. त्यामुळे संपुर्ण मेहनत व खर्च वाया गेला आहे. आंबा आणि काजु चे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांवर दोन्ही बाजुने संकट आले आहे.
उमाकांत हमरे, शेतकरी, खोडाळा. ता. मोखाडा.
2) अवकाळी पावसाने रचून ठेवुन पेटवलेल्या विटभट्ट्या अर्धवटच भाजल्या गेल्या आहेत. तसेच तयार केलेला कच्चा माल पुर्णपणे भिजला आहे. त्याचा चिखलच झाला आहे. त्यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. कच्चा माल वाचवण्यासाठी त्यावर प्लास्टिक टाकुन वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. शेतकर्यांप्रमाणे नुकसान ग्रस्त विटभट्टी चालकांना ही शासनाने नुकसान भरपाई देऊन आम्हाला सावरावे अशी आमची मागणी आहे.
अनिल येलमामे, विटभट्टी चालक.