माहिती अधिकार फलक जव्हार तहसील कार्यालयातून गायब
जव्हार प्रतिनिधी:- सुनिल जाबर
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भाग असलेल्या जव्हार तालुक्यात आजही शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी,अपुरी आरोग्य व्यवस्था ,केवळ खरीप हंगामातील शेती,रोजगारांच्या अल्प संधी अशा परिस्थितीत लोक जीवन कंठत आहेत .असे असताना तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या जव्हार तहसील कार्यालयात नागरिकांच्या हिताचा माहिती अधिकार फलकच गायब असल्याचे समोर आले आहे.
जव्हार शहरातील तसेच ग्रामीण भागातील रहिवाशांना उत्पन्नाचा दाखला,रेशन कार्ड,शालोपायोगी विविध दाखले,मतदार ओळपत्र,तसेच इतर योजनांसाठी तहसील कार्यालयात यावे लागते.मात्र माहितीच्या अधिकारात कोणाकडे ,कसा अर्ज करावा,याचा फलकच तहसील कार्यालय परिसरात किंवा अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर कुठेही लावण्यात आलेला नाही.त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होत आहे.
स्वस्त धान्य दुकान पुरवठा विभाग हा तहसील कार्यालयातच असल्याने,रेशन कार्ड दुरुस्ती,ऑनलाईन नोंदी करणे यासाठी नागरिकांची नेहमीच गर्दी असते.परंतु या कार्यालयातही सर्वसामान्यांसाठी सरकारने दिलेल्या माहितीच्या अधिकाराबाबतचा फलक गायब झाला आहे.माहितीच्या अधिकारात कोणाकडे कशी माहिती मागवावी,यासंदर्भात बोर्ड तहसील कार्यालयात आजपर्यंत लावण्यात लावण्यात आलेला नाही कोणीही अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.त्यामुळे माहिती अधिकाराविषयी जनजागृती कशी होईल हा प्रश्न आहे.
" माहिती अधिकार नवीन फलक बनवायला टाकला आहे लवकरात लवकर फलक लावण्यासाठी सूचना केली आहे " आशा तामखडे तहसीलदार जव्हार