नांदेड-हिंगोली -मुंबई रेल्वेला हिरवा कंदील ; ३० जानेवारीपासून धावणार रेल्वे सातत्यपूर्ण मागणीला यश !
हिंगोलीवरून मुंबईकरिता रेल्वे सेवा असावी या मागील बऱ्याच दिवसापासून मी करत असलेल्या मागणीला अखेर रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दिला आहे . येत्या ३० जानेवारी २०२३ पासून नियमित वेळेत आठवड्यातून दोन दिवस हि रेल्वे सेवा सुरु करण्यात आली आहे . दर सोमवारी गाडी क्र .०७४२६ आणि दर बुधवारी गाडी क्र .०७४२८ हि रेल्वे रात्री ९ वाजून १५मिनिटांनी नांदेड रेल्वे स्टेशनवरून निघणार आहे. हि गाडी नांदेड - पूर्णा-वसमत- हिंगोली- वाशिम-अकोला-मलकापूर-भुसावळ-चाळीसगाव -मनमाड-नाशिक रोड-इगतपुरी-कल्याणमार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जाईल तर परतीच्या प्रवासाला हि गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ( बांद्रा ) येथून दर मंगळवारी गाडी क्र . ०७४२७ आणि दर गुरुवारी गाडी क्र .०७४२९ हि रेल्वे सायंकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी निघून नांदेड येथे सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी पोहचेल.
याबाबत मागील बऱ्याच दिवसापासून सातत्याने केंद्रीय रेल्वे मंत्री मा. अश्विन वैष्णवजी आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा. राबसाहेब दानवे यांच्या भेटी घेऊन मागणी केली होती त्या मागणीला अखेर यश आले असून यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिंगोली -नांदेड- यवतमाळ जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी , नोकरदार, व्यापारी यांना मोठा लाभ होणार आहे. यापूर्वी हिंगोली जिल्ह्यातील जनतेला मुंबई जायचे असले तर नांदेड किंवा परभणीवरून देवगिरी, नंदीग्राम किंवा तपोवन या रेल्वेने जावे लागायचे त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती . परंतु आता हि गैरसोय दूर झाली असून रेल्वेसेवा सुरु झाल्यामुळे संपूर्ण मतदारसंघात आनंदाचे वातावरण आहे .