मुरबाड दिनांक २ प्रतिनिधी लक्ष्मण पवार
बदलापूर मध्ये काही दिवसांपूर्वी दोन आंबेडकरी तरुणांना एक टोळक्याने किरकोळ कारणावरून अमानुष मारहाण केली होती, मात्र पोलिसांनी आरोपीना अद्यापही अटक न केल्याने याचा जाब विचारत आंबेडकरी जनतेने रिपब्लिक नेते श्याम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज बदलापूर पोलिस आयुक्त कार्यालवर संतप्त मोर्चा काढून निषेध नोंदवला.
बदलापूर (पुर्व) पोलिस ठाण्याच्या हद्दीत 13/11/2022 रोजी रात्रीच्या वेळी येथीलच आदर्श गायकवाड व कुणाल जाधव या दोन बौद्ध तरुणांवर भ्याड, जीवघेणा, जातीयवादी हल्ला करण्यात आला.या हल्ल्यात त्यांना ठार मारण्याच्या हेतूने अमानुषपणे मारहाण करण्यात आली मात्र या प्रकरणी मुख्य आरोपीला अद्यापही अटक झालेली नाही.या घटनेचे सीसी टीव्ही फुटेजही मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर वायरल झाले आहे.त्यातुन ती मारहाण अतिशय क्रूर व अमानुष असल्याचे स्पष्ट दिसते आहे.त्यामुळे या घटनेची दखल घेऊन आर.पी.आय.सेक्युलरचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने यांनी तात्काळ धाव घेऊन आरोपींवर अट्रोसिटीचा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला.मात्र घटनेला पंधरा दिवस उलटूनही आरोपी अटक न झाल्याने आज संतप्त आंबेडकरी जनतेने आज मोर्चा काढला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून हा मोर्चा पोलिस ठाण्यावर गेला.यावेळी आरोपींना अटक करा...अटक करा.. पोलिस प्रशासन मुर्दाबाद अशा घोषणा मोर्चेकऱ्यांनी दिल्या.
यावेळी रवींद्र दिलीप धनगर, अभिमन्यू भालेराव, लक्ष्मण खोळंबे, रवींद्र सोनवणे, राजेश गायकवाड, धनंजय थोरात आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.
यावेळी मोर्चाला संबोधित करताना श्याम गायकवाड म्हणाले की आता दलितांनी मार खाण्याचे दिवस गेले.जर असे प्रकार होत असतील तर गावगुंडाना जशास तसे चोख उत्तर दिले जाईल.हे सामाजिक हल्ले वाढत असल्याने आता आंबेडकरी समाजाने संघटित होण्याची गरज आहे.आपण संघटित राहिलो तरच देशाचे धोक्यात असणारे संविधान आपण वाचवू शकतो.
तर आरोपींना अटक केली नाही तर राज्यभर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा रवींद्र चंदने यांनी भाषणात बोलताना दिला.