जव्हार ग्रामीण भागात भात मळणी नवीन पद्धत; जनावरांची व्यवस्था करिता उडवी सजली
पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर
जव्हार, ठाणे-पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये भात शेती हे मुख्य पीक असून येथील नागरिक कुटुंबाच्या उपजीविके करिता गरजेपुरता, भात ठेवून उरलेला भात विक्री करणे आणि आलेल्या पैशातून आपली दैनंदिन गुजरात करणे असा दिनक्रम चालू असतो, सध्या जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात भात मळणी हे मोटार सायकल ने करून, जनावरांच्या चाऱ्याकरिता उरलेला पेंढा वर्तुळाकृतीत जमा करून उडवी सजवली जात आहे.
जव्हार तालुक्यात सुमारे ६५०५.६० हेक्टरमध्ये भात पिकांची लागवड करण्यात आली आहे, गावा - गावात भात पीक चांगले आले असून, ठिकठिकाणी भात झोडणीचे काम सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांची मळणी झाली आहे, अश्या शेतकऱ्यांनी पेंढा रचून ठेवायला सुरुवात केली आहे,त्यास उडवी म्हटले जाते, निसर्गाचा लहरीपणा आणि मजुरांची कमतरता यामुळे, पूर्वीच्या तुलनेत शेती कमी केली जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
यंदा भात मळणीतून आलेल्या पेंढ्या पुढच्या पावसापर्यंत गुरांना चाऱ्यासाठी,फळे पिकविण्यासाठी, चांगल्या रीतीने साठवणूक करता याव्या यासाठी उडवी करायची पद्धत आहे. उडवी करता येणे आणि ती पावसापासून वाचवता यावी म्हणून योग्य पद्धतीने साकारता येणे, ही एक कला आहे. अंगणातली उडवी म्हणजे घराची शोभा मानली जात होती,मात्र आज शेतीची संकल्पना बदलली आहे. शेतीचे क्षेत्रही दिवसागणिक कमी होत आहे. गोठ्यातला गुराचा आवाज देखील कमी झाला आहे. जशी शेतात राबणाऱ्या माणसांचे हात कमी झाले तसेच ढवळ्या-पवळ्याची भ्रमंतीही विरळ झाली. अशा स्थितीत गावखेड्यांमध्ये स्वतः पुरती का होईना शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.
भातमळणी झाली की कमी जागेत जास्त पेंढ्या रहाव्यात म्हणून विशीष्ट रचनेत पेंढ्याची मांडणी केली जाते, त्याला उडवी म्हणतात. ग्रामीण भागात शेतकऱ्याच्या घराजवळ किंवा शेतात उडवी बघायला मिळते.
यंदा भात पिकाच्या हंगामाला उशिरा सुरुवात झाली,पावसाचा हंगाम लांबला तरी पिकाला चांगला फायदा झाला.कोणत्याही प्रकारे रोगाचा विशेष प्रादुर्भाव झाला नसल्याने भात पीक चांगले आले आहे.
वसंत नागरे,तालुका कृषी अधिकारी, जव्हार...
छाया:- सखाराम बुधर,
सागपाणा येथील,भात झोडनी आणि उडवी रचनी