४३९ सदस्यांसाठी ७२३ उमेदवार तर ११७ सदस्य बिनविरोध
पालघर प्रतिनिधी - दिनेश आंबेकर
जव्हार-: जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला असून गाव-पाड्यात आपापला उमेदवार सक्षम करून संपूर्ण ग्रामपंचायत आपल्या ताब्यात कशी आणता येईल यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापले कौशल्य पणास लावल्याचे चित्र सध्या दिसत आहे.तालुक्यातील ४८ पैकी ४६ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे.उमेदवारी अर्ज माघारी नंतर निर्णायक चित्र स्पष्ट झाले आहे.४६ सरपंच पदांसाठी तब्बल १८८ उमेदवार रिंगणात आहेत तर ४३९ सदस्यांपैकी ११७ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे ऊर्वरित ३२२ सदस्यांसाठी ७२३ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.
तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींसाठी १६ ऑक्टोंबरला मतदान होणार असून १७ ऑक्टोंबरला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.४७ सरपंच पदांसाठी २५७ उमेदवार तर ४३९ सदस्य पदासाठी ८७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.छाननी मध्ये सदस्य पदाचे १० उमेदवारी अर्ज बाद झाले होते.त्यानंतर ३० सप्टेंबरला उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख होती. अखेरच्या दिवशी सरपंच पदांसाठी ६८ उमेदवारांनी माघार घेतली तर सदस्य पदासाठी १२१ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे ११७ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी नंतर ४६ सरपंच पदांसाठी आता तब्बल १८८ तर ३२३ सदस्यांसाठी ७२३ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती जव्हार येथील तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.