किनवट प्रतिनिधी : गजानन वानोळे
गेल्या दोन महिन्यापासून इस्लापूर परिसरामध्ये चोरट्याने धुमाकूळ घातला असून या चोरट्याला पकडण्यात पोलीस यंत्रणा हि कुचकामी ठरल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यावर असंतुष्ट असलेल्या इस्लापूर येथील ग्रामपंचायत सदस्य सावन जयस्वाल यांनी वाढत्या चोरीच्या घटनेच्या निषेधार्थ इस्लापूर बाजारपेठ कडकडीत बंद करण्याचा इशारा दिला व इस्लापूर येथील मुख्य चौकामध्ये चोरीच्या निषेधार्थ आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने पोलीस यंत्रणा या चोरट्याचा बंदोबस्त लावेल काय याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. गेल्या दोन महिन्यापासून परिसरामध्ये अनेक दुकाने , भुसार दुकाने ,दुचाकी चोरी ,ट्रॅक्टर चोरी, महिलांच्या गळ्यातील व कानातील सोने हिसकावूण घेणे ,मंदिरातील दानपेटी फोडणे असे विविध प्रकार या भागात इस्लापूर परिसरात घडत असताना व रात्रंदिवस तरुण कार्यकर्ते शाळकरी मुले व प्रतिष्ठित नागरिक ही चोरीच्या घटनेमुळे जागी राहून पहारा देत असताना पोलीस प्रशासनामार्फत मात्र चोरीच्या घटना जास्त नसून त्या अपवाद आहेत असे चित्र दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने चोरट्याचा बंदोबस्त लावावा यासाठी येथील ग्रामपंचायत सदस्य सावन कुमार जयस्वाल शिवसेनेचे तरुण कार्यकर्ते निलेश पळससुरे, सुशील जोशी, विकास माहूरकर, दिनेश मोमीडवार, बालाजी कोसकेवाड, संदीप कोसकेवाड, या कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर एक प्रकारचे असमर्थन दर्शवले असल्याचे बोलले जात आहे. परिसरातील जनतेचे होणारे रात्रंदिवसाच्या जागरण व झोपमोड पाहता पोलीस प्रशासनाने चोरट्याचा बंदोबस्त लावावा अशी मागणी आता सर्व स्तरातून पुढे येत आहे. चोरीच्या घटना संदर्भात पोलीस प्रशासनाच्या विरोधात रस्ता रोको व बाजारपेठ बंद ठेवणे , या प्रकारच्या घटना संदर्भात पोलीस प्रशासनाला निवेदन येणे हा एक चर्चेचा विषय बनला आहे .