सांगोला(प्रतिनिधी):- गणेश मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, वर्षानुवर्षापासून सुरू असलेल्या गणेश उत्सवातील परंपरा कायम राहाव्यात, यासाठी प्रशासनानेही तालुक्यातील गणेशाोत्सव मंडळांना सहकार्य करावे.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक प्रबोधन करणार्या कार्यक्रमांचे आयोजन करत पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव शांततेत, उत्साहात साजरा करा असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे युवक नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी केले आहे.
राज्यात दरवर्षी गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो मात्र, मागील दोन वर्ष कोरोनासारखे जगातील संकट उभे राहिल्याने उत्सव अतिशय साध्या पध्दतीने पार पडले होते परंतु यावर्षी गणेश उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे, त्यासाठी गणेश मंडळांनी तहसील कार्यालयातुन तर शहरी भागातील मंडळाने नगरपरिषद येथून परवानगी घ्यावी व कुठलेही आक्षेपार्ह फोटो बॅनर लावू अथवा देखावा तयार करू नये. त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी किंवा सामाजिक जबाबदारी ओळखून गणेशोत्सव साजरा करावा, श्री.चे मूर्तीचे ठिकाणी मंडळाचे स्वयंसेवक नेमावेत व मंडप परिसरात जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
गणेश मंडळाने समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक बंधुतेचा संदेश द्यावा.एक गाव एक गणपती, एक गल्ली एक गणपती अशा स्वरुपाच्या संकल्पना राबवाव्यात. ध्वनी प्रदुषण नियंत्रण अधिनियम, ध्वनी प्रदुषण नियम यांचे काटेकोर पालन करावे,
वाहतुकीस अडथळा होणार नाही याची सर्व गणेशोत्सव मंडळाने काळजी घ्यावी असे सांगत यावर्षी राज्य सरकारने गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करुया असे सांगितले होते त्या अनुषंगाने मंडळांनी साऊंड लावताना सर्वोच्च न्यायालयाच्या डॉल्बी नियमांस अधिन राहून साऊंड लावावे तसेच विद्युत रोषणाई बाबत एम.एस.ई.बी. यांचेकडून योग्य ती रीतसर परवानगी घ्यावी. गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली गणेशोत्सव अतिशय साजरेपणाने साजरा करण्यात आला. यावर्षी मात्र गणेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करा, असे आवाहनही शेवटी डॉ.अनिकेत देशमुख यांनी केले आहे.