मुंबई : वरिष्ठ पातळीवर ठरल्याप्रमाणे पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली . ' त्यानंतर ते ' सागर ' बंगल्यावर आले . नेते आणि आमदारांशी चर्चा करतानाच त्यांना दिल्लीहून फोन आला . ' तुम्हाला उपमुख्यमंत्रिपद घ्यावे लागेल ' असे तिकडून सांगण्यात येताच फडणवीस यांच्या डोळ्यात अश्रू तरळले . ते पाहून तेथे उपस्थित सर्वच भावुक झाले .
शपथविधी समारंभानंतर प्रतिक्रिया देतानाही खासदार धनंजय महाडिक यांचा गळा दाटून आला होता . फडणवीस यांनी शिंदे यांचे नाव जाहीर केल्यानंतर भाजपच्या नेत्यांना मोठा धक्का बसला . या धक्क्याच्या ' वातावरणातच सर्वजण ' सागर ' बंगल्यावर आले . या ठिकाणी नेते , आमदार , खासदार अस्वस्थ होते . त्यांना फडणवीस समजावू लागले ,
असे कशासाठी केले हे सांगत असतानाच त्यांना दिल्लीहून राष्ट्रीय अध्यक्ष जे . पी . नड्डा यांचा फोन आला . तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा , असा तो निरोप होता .फडणवीस यांनी त्याला नकार दिला . पुन्हा फोन आला तेव्हा फडणवीस आतल्या खोलीत गेले . बाहेर आले . तेव्हा त्यांचा चेहरा पडला होता . पक्षाने ' मला आत्ताच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला सांगितले आहे . तेव्हा मी शपथ घेतोय ' असे त्यांनी उपस्थितांना सांगितले .
यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले . गेले अडीच वर्षे सातत्याने संघर्ष करणाऱ्या या कणखर नेत्याच्या डोळ्यात अश्रू पाहून उपस्थितांचाही गळा दाटून आला . तेथून पुन्हा सर्वजण राजभवनवर आले . शपथविधी झाला . त्यानंतर माध्यमांनी खासदार धनंजय महाडिक यांना गाठले . त्यांची प्रतिक्रिया विचारली . परंतु फडणवीस यांचा त्याग आणि दुसरीकडे पक्षाचा आदेश मानण्यासाठी स्वीकारलेले उपमुख्यमंत्रिपद याबद्दल सांगताना . महाडिक यांचाही आवाज कातर बनला . गळा दाटून आला . एक वेगळेच हे वातावरण गुरुवारी ' राजभवन ' आणि ' सागर ' बंगल्याने अनुभवले .