कोरपना /गड़चांदुर :- प्रतिनिधी मनोज गोरे
दोन दिवसापासून पुरात अडकून असलेल्या 22 वाहनधारकांना सूखरूप बाहेर काढण्यात गडचांदूर पोलीसांना यश आले आहे. गडचांदूर-धानोरा मार्गावरील भोयगाव जवळ मध्यरात्री पोलीसांनी धाडसी कामगीरी बजावली.
चंद्रपूर जिल्ह्यात मागील चार दिवसापासून सतत मुसळधार पाऊस सूरू आहे. इरई धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले तर आता गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्या गेले. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. गडचांदूर - धानोरा मार्गावरील भोयगाव जवळ दोन दिवसापासून 22 वाहनचालक आपल्या ट्रक मध्येच अडकून पडले होते. वर्धा नदीचा प्रवाह सतत वाढत असल्याने वाहनचालक बाहेर पडू शकले नाहीत. पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच, गडचांदूर पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या बचाव पथकाने वाहनचालकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र पाण्याचा प्रवाह सतत वाढत असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत होता.
अखेर मध्यरात्री 2 वाजता पोलिसांनी सर्व वाहनचालकांना बाहेर काढण्यासाठी मुसळधार पावसात बोटीच्या साहाय्याने पाण्यात उतरले. सर्व वाहनचालकांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलीसांना यश आले. वाहनचालकात 6 स्थानीय तर 16 बाहेर राज्यातील होते.
पोलीस प्रशासन जर वेळेत पोहचले नसते तर आम्ही आज सुखरूप बाहेर आलो नसतो, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांनी देत पोलिसांचे आभार मानले.
गडचांदूर पोलिसांनी सर्व वाहनचालकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.