जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
शिवजन्मभूमी परिसराचा विकास करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे, अशी ग्वाही यावेळी दिली. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या जुन्नर तालुक्यात निसर्ग पर्यटनालाही अनुकूल वातावरण आहे. इथं येणाऱ्या पर्यटकाला सर्व सुविधा देऊन पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देण्यात येईल. शहरात स्वच्छता रहावी यासाठी जुन्नरच्या भुयारी गटर योजनेसाठी आवश्यक निधी देण्यात येईल.
जुन्नरमध्ये गेल्या दोन वर्षात ४९४ कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्धाटन, भूमिपूजन करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठवून विकासाच्या कामात राजकारण न करता जनहिताची कामं करण्याची भूमिका शासनानं स्वीकारली आहे. शिवनेरी परिसराचा कायापालट, रायगडचा विकास करताना त्याचं मूळ स्वरुप कायम ठेवून विकास करण्यात येत आहे.
त्यासोबत नागरिकांसाठी पिण्याचं पाणी आणि इतर मुलभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे. इतिहासाचे संवर्धन करण्यासाठी राज्य संग्रहालयाच्या निर्मितीसाठी सल्लागार समिती गठीत करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात पंचसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अष्टविनायक परिसर विकासासह विविध रस्त्यांची कामं करण्यात येणार आहेत. अष्टविनायक परिसर विकासासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद कमी पडल्यास अधिक निधी देऊन आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येतील. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी देखील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज या नावानं राज्यातील प्रत्येक पिढीला प्रेरणा देण्याचं काम केलं आहे. महाराजांचं नाव घेताच महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटतो. त्यांचा आदर्श ठेवूनच आपल्याला पुढं जायचं आहे.
अशा युगपुरुषानं महाराष्ट्रात जन्म घेतला हे आपल्या भूमीचं भाग्य आहे. महाराजांनी दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना एकत्र करून रयतेचं राज्य निर्माण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं लोककल्याणाचं कार्य आपल्याला पुढं न्यायचं आहे.
महाराजांनी गोरगरीबांना एकत्र आणून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज समाजात तेढ निर्माण करण्याचं काम होत असताना महाराजांचा आदर्श समोर ठेवून एकोप्यानं राहण्याची गरज आहे. जुन्नरला महाराजांचं स्मारक उभारल्यानं येणाऱ्या पर्यटकासमोर त्यांचा आदर्श ठेवता येईल.