राष्ट्रीय उपाध्यक्ष फिरोज पिंजारी यांच्याकडून आयआरबीला निवेदन
खोपोली (जि. रायगड) / प्रतिनिधी
पत्रकार हा समाजासाठी जगत असतो. अन्याय, अत्याचाराविरोधात लढत असतानाच बातम्या गोळा करण्यासाठी मजल दरमजल करीत भटकत असतो. अशावेळी अनेकदा त्याला टोलचा भुर्दंडही सहन करावा लागतो. त्यामुळे पत्रकारांना टोलमाफी देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केपी न्यूज चैनल एडीटर इन चिफ फिरोज पिंजारी यांनी केली आहे.
टोलमाफीची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह एमएसआरडीसी, एनएचए व आयआरबीकडे निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे. त्याबाबत नुकतेच आयआरबीचे व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पत्रकार हा बातमीसाठी वणवण भटकंती करीत असतो, त्याला वारंवार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. पत्रकाराची आमदनी जेमतेम असते, पण लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला हा पत्रकार आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी स्व-खर्चाने बातमी व लोकांपर्यत माहिती पोहचविण्यासाठी धावपळ करीत असतो. महामार्गावर अपघाताच्या बातम्यासाठी तसेच विविध बातम्यांसाठी 'फ्रंट वॉरीयर' असलेल्या पत्रकाराला जावे लागते. समाजासाठी लढणाऱ्या, जगणाऱ्या अशा पत्रकारांना सहकार्य म्हणून टोल प्लाजावर सूट मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत सकारात्मक निर्णय घेवून कळविण्यात येईल, असे आश्वासन आयआरबीकडून देण्यात आले आहे. निवेदन देते प्रसंगी अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा केपी न्यूज चैनल एडीटर इन चिफ फिरोज पिंजारी, अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी खलिल सुर्वे, महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार पहिलवान हनुमंतराव ओव्हाळ, खालापूर वार्ता संपादक सुधीर माने आदी उपस्थित होते.