मोखाडा :सौरभ कामडी
मोखाडा : मोखाडा तालुक्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून संततधार सुरू आहे. त्यात काल दि. ०३ ऑगस्टपासून मुसळधार पाऊस कोसळत असून पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट करण्यात आला आहे. दरम्यान मध्य वैतरणा धरण परिसरात कोसळत असलेल्या पावसाने धरणाची पातळी वाढली असून धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे.
दोन दिवसांपासून पावसाने अधिकच जोर धरला असल्याने मोखाडा तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मध्य वैतरणा धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली. आता हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाची पाणीपातळी २७९.६३ मीटर टीएचडीवर पोहोचली आहे. धरण ओसंडून वाहण्याची पातळी २८५ मीटर टीएचडी आहे. धरण परिसरात संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे पाण्याची पातळी २८४ मीटरवर पोहोचली आहे, तसेच पावसाचा जोर कायम असल्याने पहाटे पावणेतीन वाजता धरणाचे दोन दरवाजे १० सेंमीने उघडण्यात आले आहेत. यातून ७०६.३० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला, मात्र पावसाचा जोर वाढला आणि पाण्याची पातळी २८४.२४ मीटर झाली. त्यामुळे सकाळी नऊ वाजता धरणाचे पाचही दरवाजे ४० सेंमीने उघडण्यात आले आहेत. यातून सात हजार ४१६ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
मुंबई व उपनगरांची तहान भागवणारे मोखाड्यातील मध्य वैतरणा धरण संततधारेने पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाची पातळी २७९.६३ मीटर टीएचडी आहे. संततधार पावसाने आज (ता. ४) पाण्याची पातळी २८४ मीटर टीएचडीवर पोहोचली आहे. त्यामुळे पहाटेपासून ७०६.३० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वैतरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.