गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याबाबत उलटसुलट चर्चा माध्यमांमध्ये सुरु आहेत. नुकतीच मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी खासदार संजय राऊत यांची खाजगी कामासाठी भेट घेतली मात्र माध्यमांनी मात्र या दोन पक्षात युती होणार असल्याच्या बातम्या चालवल्या.एका बाजूला हे सर्व सुरु असताना आता दुसऱ्या बाजूला खासदार संजय राऊत यांनी हा विषय पुन्हा छेडला आहे. आज पत्रकारांची बोलताना संजय राऊत म्हणाले, राज ठाकरे आणि आमचे संबंध चांगले आहेत. आमच्या मनात आलं तर राज ठाकरे नां थेट फोन करू शकतो, त्यासाठी आम्हाला मध्यस्थाची गरज नाही, असं सांगतानाच ज्यांना देश आणि राज्याच्या भल्यासाठी एकत्र यावं वाटत असेल त्यांनी सर्व किल्मिषं दूर करून एकत्र आलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
ज्या प्रकारची हुकूमशाही, दडपशाही सुरू आहे. पैशाचं राजकारण सुरू आहे. ही महाराष्ट्राची ओळख पुसायची असेल तर या प्रवृत्ती विरुद्ध ज्यांची मनापासून आणि प्रामाणिकपणे लढण्याची इच्छा आहे, त्या सर्व घटकांनी एकत्र यावं या मताचा मी आहे. अनेक दगडांवर पाय ठेवून आता कुणालाही महाराष्ट्रात राजकारण करता येणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.