भारतीय संविधान तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे. - कु.पल्लवी पाईकराव
ढाणकी /प्रतिनिधी :
ढाणकी येथे संविधान चौक उभारण्यात आला. त्यानिमित्त संविधान हे सर्व सामान्य लोकांना कळावे म्हणून कु. पल्लवी प्रकाश पाईकराव यांनी स्वखर्चाने संविधानाच्या प्रास्ताविकतेची उभारणी चौकामध्ये करून, संविधानाचे महत्त्व अधोरेखित करीत म्हणाल्या, की संविधान म्हणजे फक्त माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क नसून, माणसाला माणूस म्हणून स्वाभिमानाने जगण्याचा हक्क म्हणजे संविधान होय. संविधान तळागाळातील जनतेला समजावणे हे प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीचे कर्तव्य आहे. म्हणून याप्रसंगी प्रास्ताविकतेचे अनावरण करून त्यांनी त्यांचे कार्य पार पाडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला.
याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित बुद्धाचार्य चिमणाजी बापू काळबांडे यांनी आपले विचार व्यक्त केले. संबोधी गायकवाड पाणीपुरवठा सभापती नगरपंचायत ढाणकी, अनिल सावळे अध्यक्ष समता फाउंडेशन आदिलाबाद, तुळशीराम गायकवाड माजी सैनिक हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश घुगरे यांनी केले तर आभार प्रकाश पाईकराव यांनी व्यक्त केले. या संपुर्ण कार्यक्रमाचं आयोजन सामाजिक कार्यकर्ते व्यंकटी धुळे यांनी केले.