विवेक वळसे पाटलांनी केली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पिकाची पाहणी
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात मागील काही दिवस अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील पोहचले होते. ते ज्यावेळी पाहणी करण्यासाठी पोहचले त्यावेळी वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यावेळी त्यांनी कसलीही तमा न बाळगता मोबाईलच्या उजेडात शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील गावांना शनिवारी सायंकाळी गारपीटीचा जबरदस्त तडाखा बसला. गारांच्या माऱ्याने शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचं सर्व पीक आडवं झालं आहे. शेतात गारांचा खच पडला होता. काही वेळातच सुपारी आणि लिंबाच्या आकाराएवढ्या मोठ्या गारा पडू लागल्या. गारांचा खच तयार झाला. पोंदेवाडी, खडकवाडी, जारकरवाडी, वाळुंजनगर, रोडेवाडीफाटा, बढेकरमळा, द्रोणागिरीमळा, लाखणगाव, ज्ञानेश्वरवस्ती या परिसरात गारांमुळे कांद्याच्या पिकांचे शेंडे मोडून पडले कांदा पिकांचे त्याचबरोबर मिरची, कलिंगड, फ्लावर, काकडी, भुईमुग, गहू या पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अवकाळी पाऊस आणि गारांचा मोठा पडलेला खच पाहून शेतकरी हवालदिल झाले होते. या सगळ्या परिस्थितीत धीर देण्यासाठी विवेक वळसे पाटील गेले होते. त्यांनी या सगळ्या शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम केलं. त्यासोबतच लवकरात लवकर पंचनामा करु, असं आश्वासनदेखील त्यांनी दिलं.
प्रतिनिधी - आकाश भालेराव आंबेगाव