संप सुरू असताना सुधा तहसीलदार रमा जोशी आणि सहाय्यक गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे यांनी पाळला आपल्या पदाचा मान , केली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी
लाखणगाव, अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव, पोंदेवाडी, देवगाव, धामणी आणि पूर्व भागात बऱ्याच ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. असे असले तरीही सदरचा विषय संवेदनशील असल्याने आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी आणि सहाय्यक गट विकास अधिकारी अर्चना कोल्हे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी नायब तहसीलदार दामूराजे अस्वले, कृषी सहाय्यक प्रवीण मिर्के, तलाठी विशाल मुंगळे, मंडल अधीकारी विश्वास शिंदे, कोतवाल विकास दाभाडे आणी ग्रामस्थ उपस्थित होते. आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यात शेतीचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेल्या पिकांना तसेच टोमॅटो, कांदा, तरकारी यांना मोठा फटका बसला. येत्या दोन दिवसांत सर्व नुकसानग्रस्तांचे पंचनामे सुरु होतील असे जोशी आणि कोल्हे यांनी म्हटले आहे.जुनी पेन्शन योजच्या मागणीसाठी १४ मार्चपासून शासकीय कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयातील कामे खोळंबली आहेत. असे असताना अवकाळी पाऊस आणि गारपीट याचा फटका आंबेगाव तालुक्याला देखील बसला. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासंदर्भात तलाठी व कृषी सहायक यांना सदरचा विषय संवेदनशील असल्यामुळे सर्वांनी सक्रियपणे पंचनामे पूर्ण करावेत, असे आवाहन केले होते. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.
प्रतिनिधी - आकाश भालेराव आंबेगाव