पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी
गेल्या 25 वर्षांची परंपरा जोपासत आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांची उपस्थिती सह्याद्रीतून समाजबांधवांची मोठी गर्दीआद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी गेल्या विस ते पंचवीस वर्षांपासून सुरू असलेली परंपरा कायम ठेवत स्मृतीस्थळी जाऊन राघोजी भांगरे यांना अभिवादन केले.स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रज सरकारविरुद्ध बंड पुकारणाऱ्या राघोजी भांगरे यांनी आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पहिला लढा उभारला होता. सावकारशाही आणि ब्रिटिश सत्तेला धडा शिकवणाऱ्या या महान क्रांतीवीराला ठाणे येथील कारागृहात फाशी देण्यात आली होती. त्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी 2 मे रोजी येथे उपस्थित राहणे हे आमचे कर्तव्य असल्याचे प्रदीप वाघ यांनी सांगितले.
वाघ म्हणाले की, “ही केवळ परंपरा नाही, तर आमच्या दैवताप्रती असलेली निष्ठा आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण जिवंत ठेवणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे.” त्यांनी यावेळी आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि संशोधक डॉ. गोविंद गारे यांच्या कार्याचाही गौरव केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे राघोजी भांगरे यांच्या स्मृतींना व्यापक ओळख मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला सह्याद्रीच्या विविध भागांतून आलेल्या समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. वातावरण भावनिक आणि प्रेरणादायी झाले होते. उपस्थितांनी एकमुखाने क्रांतीवीरांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प केला.महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाच्या वतीने या स्मृतीदिनानिमित्त शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून आदिवासी समाजाच्या इतिहासाची जाणीव आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नेत्यांचे योगदान अधोरेखित करण्यात आले.
राघोजी भांगरे यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
