अटल भूजल पंधरवड्याचे उद्घाटन भूजल व्यवस्थापनासाठी लोकसहभागातून प्रयत्न करा- आयुक्त चिंतामण जोशी
इंडिया न्युज प्रतिनीधी
पुणे दि १६:-अटल भूजल योजनेत समाविष्ट गावांनी लोक सहभागातून गावाची जलसमृद्धी टिकविण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असून भूजल व्यवस्थापनासाठी लोकसहभागातून प्रयत्न करावा, असे आवाहन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त तथा प्रकल्प संचालक चिंतामणी जोशी यांनी अटल भूजल पंधरवड्याच्या राज्यस्तरीय उद्घाटनप्रसंगी केले.
यावेळी सहसंचालक डॉ. विजय पाखमोडे, प्रकल्प समन्वयक भाग्यश्री मग्गीरवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. चंद्रकांत भोयर, प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाचे डॉ. प्रमोद रेड्डी, जिल्हा भूवैज्ञानिक कार्यालयाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. एस. गावडे उपस्थित होते.
आयुक्त श्री. जोशी पुढे म्हणाले, भविष्यातील पाणी संकट टाळण्यासाठी तसेच समृद्ध भविष्यासाठी गावाची जलसमृद्धी महत्त्वाची आहे.अटल भूजल योजनेत समाविष्ट असणाऱ्या गावांमध्ये योजनेच्या उद्दीष्टांबाबत व्यापक जनजागृतीवर भर द्यावा. लोकांनी घरगुती आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा उपयोग काटकसरीने व नियोजनबद्ध पद्धतीने करावा यासाठी ग्राम स्तरावर जनजागृती करण्यासाठी २७ फेब्रुवारी पर्यंत अटल भूजल पंधरवडा राबविण्यात यावा. भूजल पातळीतील घसरण थांबवण्यासाठी केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमातून भूजल व्यवस्थापनासाठी अटल भूजल योजना राज्यातील १३ जिल्ह्यातील १ हजार ४४२ गावांमध्ये सुरु आहे.
ते पुढे म्हणाले, आर्थिक आणि सामाजिक विकासाचे चक्र पाण्यावर अवलंबून आहे. भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे खालावलेली भूजल पातळी वाढविण्यासाठी ग्रामस्थांनी घरगुती आणि शेतीसाठी पाणी बचतीच्या उपाययोजनांचा मोठ्या प्रमाणात अवलंब करावा. जलसुरक्षा आराखडा, जल अंदाजपत्रक, भूजल पातळी, पर्जन्यमान, पाणी गुणवत्ता याबाबत लोकांमध्ये साक्षरता निर्माण झाली तर लोकांना पाण्याचे महत्व कळेल आणि पाणी बचतीची सवय लागेल. यासाठी अटल भूजल पंधरावडा कालावधी दरम्यान विविध माहिती शिक्षण संवाद उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
अटल भूजल पंधरवड्यात राबवण्यात येणारे उपक्रम
या पंधरवड्यादरम्यान विविध माध्यमाद्वारे प्रसिद्धी, ग्रामस्तरावर शेतकरी मेळावे, महाडीबीटी पोर्टलवर सूक्ष्म सिंचनासाठी शेतकऱ्याचे ऑनलाईन अर्ज भरणे, देशी वाणाच्या फळे व भाजीपाला बियाण्यांचे प्रदर्शन व महिला बचतगट, अंगणवाडी सेविकांना परस बागेसाठी वितरण, देशी वाणाच्या रोपांची लागवड, शाळांमध्ये जलदिंडीचे आयोजन, घरगुती व शेतीसाठी पाणी बचतीच्या, भूजल पुर्नभरण व जलसंधारण कामाच्या उपाययोजनांबाबत तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, भूजल मित्र, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्य, अंगणवाडी सेविका यांच्यासाठी कार्यशाळा, महिला आणि पाणी या विषयावर परिसंवाद, चित्ररथाद्वारे जनजागृती, भूजलासंबंधी माहिती ग्रामपंचायतीमध्ये प्रदर्शित करणे, स्वागत फलक उभारणी, कृषी प्रदर्शनामध्ये सहभाग, ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय येथे कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान छतावरील पाऊस पाणी संकलन लाईव्ह मॉडेल, रिचार्ज शॉफ्ट व पर्जन्यमापक या मॉडेलची माहिती देणे, ग्रामपंचायत स्तरावर मुले व महिलांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन, फिल्म शोचे आयोजन करून अटल भूजल योजनेची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांद्वारे व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे, असे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे सहसंचालक डॉ. विजय पाखमोडे यांनी कळविले आहे.
प्रतिनीधी:-अभिषेक जाधव