जव्हार प्रतिनिधी- दिनेश आंबेकर
देशाच्या राजकारणातील महत्त्वाचा कणा समजल्या जाणाऱ्या स्थानिक ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत रंगत वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.जव्हार तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूका होत असून तालुक्यात प्रथमच थेट जनतेतून सरपंच पदाचा उमेदवार निवडला जाणार असल्याने ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार हे आता स्पष्ट झाले असून सर्वच राजकीय पक्षांमध्ये सर्व समावेशक सरपंच पदाचा उमेदवार शोधण्याचा कल दिसून येत होता.तालुक्यात काही ग्रामपंचायतीमध्ये तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढत होणार असल्याने ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापले आहे.
तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून येत्या १६ तारखेला मतदान होणार आहे.त्यामुळे गावातील राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघाले असून गावातील चौका-चौकात,चावडीवर प्रचाराचे बॅनर,पोस्टर लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
ग्रामपंचायतीची निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर जरी लढली जात नसली तरी राजकीय पक्षांचे नेते आपापल्या पॅनलचा उमेदवार सरपंच पदासाठी निवडून यावा याकरिता गावामध्ये चकरा मारताना दिसत आहेत. त्यामुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या पॅनलचे उमेदवार कसे जिंकून येतील यासाठी कंबर कसून प्रचार करीत आहेत.
तालुक्यात ग्रामपंचायतींचा गेल्या वर्षभरापूर्वीच कार्यकाळ संपल्याने ग्रामपंचायतींवर प्रशासक राज सुरू झाले होते.मात्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्याने प्रशासकराज संपुष्टात येऊन सरपंच पदासाठी जनतेतून थेट निवडणूक होणार असल्याने प्रत्येक पॅनलने आपलाच उमेदवार सरपंचपदी निवडून यावा यासाठी चांगलीच कंबर कसली असल्याने सरपंच पदाची निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे.