पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे फियाट इंडिया ऑटोमोबाईल्सच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यात येणाऱ्या ज्योती-सावित्री आंतरराष्ट्रीय शाळेच्या आणि महात्मा जोतिबा फुले सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृती जतन करण्यासाठी ३० कोटी खर्च करून खानवडी येथे मुलींची आदर्श शाळा उभारण्यात येत आहे. या शाळेत इयत्ता ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थीनींसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून आदर्श शाळेसाठी कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांच्यासारख्या महान व्यक्तींचा विचार घेऊन आपण पुढे जायला हवं. यावर्षी ९६ कोटी रुपये शाळा सुधार कार्यक्रमासाठी देण्यात येत आहेत.
त्यात जिल्ह्यातील ४१० शाळांमध्ये दर्जेदार सुविधा देण्यात येणार असून त्यात जिल्ह्यातील ४० टक्के विद्यार्थी कार्यक्रमात समाविष्ट होत आहेत. टप्प्याटप्प्यानं इतरही शाळांमधून हा कार्यक्रम राबवण्यात येईल. शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी खाजगी संस्थांची मदत घेण्यात येईल. ग्रामस्थांनी देखील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं. शासनातर्फे निवासी शाळेच्या संरक्षक भिंतीचं काम करण्यात येईल.
गावातील इयत्ता १ ली ते ५ वीची शाळाही भविष्यात आदर्श शाळेशी जोडण्यात येईल. पुरंदरच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. अर्थसंकल्पात जेजुरी आणि परिसराच्या विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी विकासकामं गतीनं होणं गरजेचं आहे. खानवडी पाझर तलावाचा उपयोग गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी होण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील.
खानवडीच्या विकासासाठी गरजेच्या बाबींची पूर्तता करण्यात येईल. पुण्यातील महात्मा फुले वाड्यासाठीही १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या वडू बुद्रुक येथील स्मारकासाठी २५० कोटी, पुरंदर रिंगरोडच्या जमीन संपादनासाठी १५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.