शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी 'नाम'चे भरीव कार्य!
उपविभागीय अधिकारी सावनकुमार ; मान्यवरांच्या हस्ते सानुग्रह धनादेशाचे वितरण
उमरखेड प्रतिनिधी:- संजय जाधव
पुसद,ता.३१ : 'नाम फाऊंडेशन' आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या परिवाराला मदत तर करतेच, सोबतच शेतकरी आत्महत्या कश्या रोखल्या जातील यासाठी भरीव असे योगदान देऊन शासन-प्रशासनास मदत करीत आहे असे प्रतिपादन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा पुसदचे उपविभागीय अधिकारी सावनकुमार यांनी अध्यक्षस्थानावरुन बोलताना केले.
पुसद येथील गुणवंतराव देशमुख विद्यालयात गुरुवारी(ता.३१) आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना सानुग्रह धनादेश वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून पुसदचे तहसीलदार राजेश चव्हाण,महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य अॅड.आशिष देशमुख उपस्थित होते.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा असतांना शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या ह्या देशाला लाजिरवाणी बाब असून अश्या कठीण प्रसंगी त्यांच्या सोबत उभे राहण्यासाठी जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्य नाम फाऊंडेशनच्या वतीने विदर्भ खानदेश समन्वयक हरीश इथापे यांच्या प्रयत्नातून व यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन पवार यांच्या मार्गदर्शनात पुसद,उमरखेड,महागाव,दिग्रस व दारव्हा या पाच तालुक्यातील ९५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी पंचावीस हजार रुपये सानुग्रह राशीचे धनादेश वाटप मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात नाम फाऊंडेशन चे पुसद उपविभागीय समन्वयक स्वप्नील देशमुख यांनी आपल्या प्रस्ताविकेतून नाम चे उद्देश व कार्याची विस्तृत माहिती सांगून नाम अंतर्गत मिळालेल्या निधीचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी व लघुउद्योग उभारण्यासाठी करावा असे आवाहन केले.
या वेळी नामचे धनंजय देशमुख, पवन देशमुख, सुरेश आढाव, अनिल दामोधर, संजय रेक्कावार, उमरखेड समन्वयक दीपक ठाकरे, दिग्रस समन्वयक रवींद्र राऊत, महागाव समन्वयक प्रल्हाद कदम, गजानन पवार, दारव्हा समन्वयक देवेंद्र राऊत हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण देशमुख सवणेकर,सुभाष राठोड, अमोल उबाळे, हरगोविंद कदम, तात्या नाईक, अमोल दामोधर,यशवंत देशमुख, यांचेसह संवेदना सोशल फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी यांनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामगीताचार्य गणेश धर्माळे, तर आभार गणेश शिंदे यांनी मानले.