ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यासाठी सोमवारपासून काम बंद आंदोलन...
पालघर जिल्हा प्रतिनिधी:- सुनिल जाबर
पालघर जिल्ह्यातील सर्व ग्रामरोजगार सेवकांनी विविध मागण्यासाठी सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारले असून याबाबतचे निवेदन संबंधित विभागास व मंत्रीमहोदयांना या अगोदरच दिलेले असून कोणताही तोडगा न निघाल्या मुळे अखेर आंदोलनाची भूमिका घेण्यात आलेली आहे.
सन 2006 पासून ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ग्राम रोजगार सेवक पद शासनाने अस्तित्वात आणले. रोजगार हमी योजना कामाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामरोजगार सेवकांची भूमिका महत्वाची आहे. अंदाजपत्रक तयार करण्यापासून ते रोजगार हमीची कामे सुरु करून हजेरी पत्रक पूर्णतः भरून मजुरी अदा करणे व इतर कामे ग्राम रोजगार सेवकांकडून करवून घेतली जातात. याचा मोबदला म्हणून ग्राम रोजगार सेवक यांना सव्वा दोन टक्के मानधन म्हणजेच मजुरांची मजुरी एक लाख रुपये शासन अदा करते. तेव्हा ग्राम रोजगार सेवकाला दोन हजार दोनशे पन्नास रुपये मानधन मिळते. तसेच ग्रामपंचायत ते पंचायत समिती स्तरावर येण्या -जाण्यासाठी प्रवास भत्ता व अल्पोपाहार भत्ता देण्याची शासनाची तरतूद आहे. मात्र ते ही न दिले जात असल्यामुळे रोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच अल्प मानधनावर ग्रामपातळीवर विविध काम करून घेत आहे. शासनाच्या वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार प्रामाणिकपणे त्यांचे काम चालू आहे. शासन निर्णयानुसार रोजगार सेवकांच्या कामाची वेळ ही अर्धवेळ असताना शासन रोजगार सेवकांकडून पूर्णवेळ काम करून घेत असल्याची तक्रार निवेदनात केली आहे.
त्यांचप्रमाणे महात्मा गांधी रा.ग्रा.रो.ह. योजनेअंतर्गत अनुज्ञय 262 कामे करून हजारो मजूरांच्या हाताला काम देणारा व ग्रामीण भागातील रोजगारा साठी शहारा कडे होणाऱ्या स्तलांतर रोखण्यासाठी जबाबदार असणाऱ्या रोजगार सेवक आजमितीस सुविधांविना आपल्या संसाराचा गाडा चालविण्यास असमर्थ असल्याची खंत व्यक्त करीत रोजगारासाठी शहराकडे स्तलांतर होण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. मनरेगाचा मुख्य कणा असलेला रोजगार सेवकांना शासन सेवेत रुजू करून घ्यावे या मागणी बरोबरच विविध सोयी- सुविधांपासून वंचित असल्याने व त्यांच्याकडे शासन गांभीर्याने पाहात नसल्याने सोमवारपासून पालघर जिल्ह्यातील रोजगार सेवकांनी काम बंद आंदोलन छेडले आहे.