प्रहार जनशक्ती संघटनेकडून गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी
बुलढाणा जिल्ह्यामध्ये २६ व २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचा तातडीने पंचनामा करण्यात यावा व नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे तहसीलदार मलकापूर यांचे मार्फत एका निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये २६ व २७ फेब्रुवारी २०२४ रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यामध्ये एैन काढणीवर आलेले गहू, हरभरा, ज्वारी यासह आदी पिकांची नासाडी झाली असून गहू व हरभरा शेतातच आडवा पडला आहे. तर आंब्याला आलेला मोहर सुध्दा गळून पडला असून फळ पिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्यांनी संत्रा तसेच आदी फळ पिकांची लागवड केलेली आहे त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान या दोन दिवसाच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने अतोनात नुकसान केले आहे.
खरीप हंगामाने निराशा केल्यानंतर रब्बी हंगामात तरी चांगले उत्पन्न होईल या आशेवर असतांनाच एैन हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस व गारपिटीने हिसकावल्याने शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला असून त्यांच्या झालेल्या नुकसानीचा तातडीने महसूल प्रशासनाच्या वतीने सर्व्हे करण्यात यावा. तसेच त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी. जेणे करून झालेल्या नुकसानीबाबत त्यांना काहीअंशी दिलासा मिळू शकेल, अशी मागणी अजय टप यांनी केली आहे.