संत निस्वार्थ भावनेने निरंतर आपणांस जागे करीत असतात.- ह.भ.प. गजानन माऊली तामसेकर.
[पिंपळगाव (वन) येथील अखंड हरिनाम सप्ताहात प्रतिपादन.]
ढाणकी/ प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या पैनगंगा अभयारण्याच्या सुरुवातीलाच मौजे पिंपळगाव (वन) येथे, अखंड हरिनाम सप्ताह तथा संगीत भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून, ह.भ.प. तुकाराम महाराज फुटाणकर यांच्या मार्गदर्शनात हा सप्ताह सुरू असून, ह.भ.प. भीमराव महाराज सूर्यवंशी फुटाणकर यांच्या रसाळ वाणीतून संगीत भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये पाचव्या दिवसाची कीर्तन सेवा, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. गजानन महाराज तामसेकर यांच्या वाटेला आली. "काय सांगू आता, संतांचे उपकार॥
मज निरंतर, जागविती॥ या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातून, संतांचे सामान्य जीवावर असलेले उपकार याबद्दल महत्त्व विशद करण्यात आले. हा अभंग सोडविताना ह.भ.प. गजु माऊली यांनी, सामान्य जीवावर असलेले आई-वडिलांचे उपकार, शेतकरी बांधवांचे उपकार, वीर सैनिकांचे उपकार, महापुरुषांचे उपकार आणि संतांचे उपकार यावर प्रकाश टाकला. संत हे सर्व सामान्य जीवांवर निस्वार्थ भावनेने आपल्या कृपेचे उपकार करीत असतात. आपण त्यांच्या उपकारातून कधीच उतराई होऊ शकत नाही. आपलं हित कशात आहे ? याकरिता संत आपल्याला निरंतर जागे करीत असतात. जशी गोमाता आपल्या वासराला निस्वार्थ प्रेम भावनेने सांभाळते ना, अगदी तसेच संत सुद्धा आपणास त्या प्रेम भावनेने सांभाळीत असतात. म्हणून सदा सर्वदा संतांची संगती घडावी याकरिता आपण प्रयत्नशील असले पाहिजे. या अभंगाच्या माध्यमातून ह.भ.प. गजु माऊली तामसेकर यांनी उत्कृष्ट असा उपदेश उपस्थित भाविक भक्तांना या ठिकाणी दिला. त्यांच्या कीर्तनाने पिंपळगाव वासी मंत्रमुग्ध झाले.