लाच घेतला दारुचा खंबा..! वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक.!
जव्हार प्रतिनिधी - सुनिल जाबर
सरकारी कामात लाच म्हणून अनेकदा रोख रक्कमेची मागणी केली जाते. काही वेळेस रोख रक्कमेसोबत भेट वस्तूदेखील मागितली जाते. पालघरमध्ये लाच म्हणून रोख रक्कमेसोबत दारूचा खंबा मागणाऱ्या वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
विजय लक्ष्मण धुरी आणि विष्णू पोपट सांगळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पालघर लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
एका बांधकाम व्यवसायिकाकडे मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या व्यक्तीचे एक प्रकरण वनविभाग वाडा येथे एन.ए. करिता ‘ना हरकत’ दाखला मिळण्याबाबत काम प्रलंबित होते. यासाठी पंचनामा झाला नव्हता. पंचनामा करण्यासाठी या आरोपींनी दहा हजार रुपये रोख आणि दारूचा खंबा लाच म्हणून मागितला होता.
दारूचा खंबा तात्काळ स्वरुपात द्यावा असेही आरोपींनी तक्रारदाराकडे मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे धाव घेत याबाबत माहिती दिली.
त्यानंतर लाचलुचपत अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यावेळी आरोपी लक्ष्मण धुरी यांनी वाडा येथील वनविभागाच्या शासकीय कार्यालयात एक दारुचा खंबा स्विकारताना रंगेहात पकडले. लाचलुचपत अधिकाऱ्याने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली.