पालघर प्रतिनिधी – दिनेश आंबेकर
जव्हार : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा ‘स्वच्छता दिन’ म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जात असून जव्हार तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या शिरोशी या गावातील बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन हातामध्ये झाडू घेऊन संपूर्ण गावाची स्वच्छता करून गाव स्वच्छता करून स्वच्छतेचा संदेश दिला. महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला असा संदेश दिला असून आज खेडे स्वयंपूर्ण होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहेत.
तसेच गावांमध्ये दुर्गंधी पसरू नये व व आपलं गाव स्वच्छ राहावे म्हणून एक दिवस तरी गावातल्याच लोकांनी आपल्या गावाची स्वच्छता करावी. जेणेकरून आपल्या गावात कुठल्याही प्रकारचा कचरा होणार नाही. यासाठी उमेद अभियाना अंतर्गत कार्यरत असलेल्या महिला बचत गटाच्या वतीने आज शिरोशी ग्रामपंचायत परिसरातील संपूर्ण रस्ते, गल्लीबोळ झाडून गाव स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या उपक्रमासाठी शिरोशी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक बळवंत गवळी तसेच सर्व महिला बचत गटाच्या सदस्य उमेद अभियानाच्या प्रेरिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या अभियानामध्ये सहभागी झाले होते.