पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी
जव्हार :जव्हार तालुक्यात ४८ ग्रामपंचायत व दोन ग्रामदान मंडळात जल जीवन मिशन’ अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या नळपाणी पुरवठा योजना गेल्या तीन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहेत.त्यामुळे, तालुक्यातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शिवाय, उन्हाळी शेती, गुरांना पाणी सारख्या समस्याही उद्भवू लागल्या आहेत.यावर उपाय योजना व्हावी म्हणून,
जव्हार तालुका सरपंच संघटना आक्रमक झाली असून तालुक्यातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत व्हावा याकरिता मंगळवारी सकाळी 11 वाजता जव्हार तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात, तालुकाभरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही तर 23 डिसेंबर रोजी सरपंच संघटनेकडून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सरपंच संघटनेचे अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी दिला आहे.
शासनाने शेकडो कोट्यवधी रुपये खर्च करूनही या योजना अद्याप कार्यान्वित न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.तथापि,जव्हार तालुका हा दुर्गम व डोंगराळ भाग असून सध्या उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना व नागरिकांना मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून येत्या सात दिवसांत नळपाणी योजनांची कामे सुरू न केल्यास पंचायत समिती कार्यालय, जव्हार येथे दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सरपंच संघटना, जव्हार यांच्याकडून देण्यात आला आहे.नळपाणी योजना तात्काळ पूर्ण करून ग्रामस्थांना नियमित व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली असून प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
