मागण्यांसाठी प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन.
पालघर:सौरभ कामडी
मुंबई ची तहान भागवण्यासाठी मोखाड्यात मध्य वैतरणा धरण बांधण्यात आले आहे.
मोखाड्यातील मध्य वैतरणा धरणात मोखाड्यातील 61 आदिवासी कुटुंब बाधीत झाले आहे. यामधील 33 कुटुंबाचे ठाणे जिल्ह्यातील विहीगांव येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, त्यांना प्राथमिक सुविधा ऊपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. 26 वनपट्टे धारक प्रकल्प ग्रस्तांना त्याची 18 वर्षाची बुडीत कृषी मजुरीचा मोबदला देण्यात आलेला नाही. तर 2 कुटुंबाची जमीन या धरणात गेल्याचा त्यांना कुठलाही मोबदला देण्यात आलेला नाही. तसेच वनविभागाने धरणालगत 50 हेक्टर जमीन कोचाळे येथील सामुहिक वन समितीला दिली आहे. त्यावर महापालिकेने अतिक्रमण केल्याचा आरोप प्रकल्प ग्रस्तांनी केला आहे. प्रकल्प ग्रस्तांनी न्याय मिळण्यासाठी अनेकदा मुंबई महापालीका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहेत. अनेकदा आंदोलने देखील केली आहेत.
यावेळी न्याय मिळविण्यासाठी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष रामा कडु यांच्या नेतृत्वाखाली, प्रकल्प ग्रस्त कुटुंबांनी मध्य वैतरणा धरणावर धडक दिली आहे. तसेच धरणाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी ताळ्यावर आले आहे. या आंदोलनाला महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश कुलकर्णी, सहाय्यक अभियंता चंद्रकांत सुर्यवंशी आणि दुय्यम अभियंता प्रकाश राठोड सामोरे गेले. त्यांनी आंदोलकांचे म्हणने जाणुन घेत, प्रकल्प ग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी आठवडाभरात एक संयुक्त बैठक घेण्याचे तोंडी आश्वासन दिले आहे. तसेच 50 हेक्टर वनजमीन तिढा तीन महिन्यात सोडवणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्याने, प्रकल्प ग्रस्तांनी आपले आंदोलन संध्याकाळी 5 वाजता स्थगित केले आहे.
