दोन-तीन महिन्यापासून तार तुटलेल्या अवस्थेत
गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर येथील घटना
गोंडपिपरी चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे
तालुक्यातील वर्धा नदीकाठावर साकमुर गाव वसलं असून या भागात नदीला आलेल्या पुरामुळे परिस्थिती गंभीर आहे.परिसरात अजूनही पाणी साचले असताना सकमुर (चेकबापूर) येथील शेतकऱ्याचा जिवंत विद्युत ताराच्या स्पर्शामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दि.१६ शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.राजेश्वर मोतीराम तोहगावकर (वय ५५) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
गेल्या दीड - दोन महिन्यापूर्वी वादळामुळे सकमुरात शेतातील काही विद्युत खांब कोसळले.त्याची तक्रार व माहिती शेतकऱ्यांनी महावितरण विभागाला दिली होती.त्यांनी विद्युत पुरवठा खंडीत केला पण दोन महिने लोटून सुध्दा खांब उभे केले नाही.तुटलेल्या तारांची विल्हेवाट लावली नाही.नेहमीप्रमाणे राजेश्वर आपल्या शेताकडे जात असताना तारांवरून त्याचा पाय गेला.त्याचवेळी अचानक राजेश्र्वरला करंट लागला.त्यानंतर तो तारावरच कोसळला.शरीराला विजेचा तार स्पर्श झाला ज्या-ज्या ठिकाणी तार स्पर्श झाला त्या ठिकाणी जखम झाली असून शेतकरी जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.आपल्या कर्तव्यात निष्काळजी करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कडक कार्यवाही करावी,अशा मागणीसह कुटुंबियांना आर्थिक मदत द्या,अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य अशोक रेचनकर यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे.दरम्यान महावितरणचे अधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय प्रेत उचलणार नाही शवविच्छेदण करू देणार नाही अशी आक्रमक भूमिका कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी घेतली आहे.मृतक राजेश्वर तोहगावकर यांच्या पच्यात दोन मुले,पत्नी असून राजेश्वरच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.वृत्त लिहेपर्यंत कसलाही तोडगा निघाला न्हवता.दीड-दोन महिन्यांपासून बंद असलेला विद्युत प्रवाह अचानक सुरू कसा झाला हा संशोधनाचा विषय असून पुढील तपास धाब्याचे ठाणेदार सुशील धोपटे करीत आहे.