स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
नंदुरबार : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दहावी, बारावी व त्यानंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशित असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास तसेच शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते.
6 जानेवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये बदल करण्यात आला असून शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेले विद्यार्थीही या योजनेचा लाभ घेवू शकतो. यासाठी विद्यार्थ्यांस 50 टक्के गुण असणे आवश्यक राहील. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दिव्यांग विद्यार्थ्यांस 3 टक्के आरक्षण असून यासाठी गुणवत्तेची टक्केवारी 40 टक्के इतकी राहील.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी नजीकच्या शासकीय मुलांचे, मुलींचे वसतीगृहात तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे संपर्क साधावा.