रांझणी कृषि विद्यालयातर्फे रॅली काढून राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा
तळोदा तालुक्यातील रांझणी येथील शेठ राणूलाल फुलचंद जैन कृषि तंत्र विद्यालयात राष्ट्रीय शेतकरी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कृषि विद्यालय रांझणी व दोंडाईचा येथील कृषिदूत यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शेतकरी दिवसाचे औचित्य साधून कृषि विद्यालयाच्या वतीने रांझणी गावातून रॅली काढण्यात आली या रॅलीचे उद्घाटन संरपच अजय ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कृषि विद्यालयात प्राचार्य प्रविण वसावे यांच्या हस्ते शेतीशी निगडित शेती औजारे नांगर, पांभर, कोळपे आदींचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश पाडवी यांनी केले तर विद्यालयाची विद्यार्थींनी प्रज्ञा नाईक हिने राष्ट्रीय शेतकरी दिवस याविषयी बोलतांना सांगितले की, भारत हा शेतीप्रधान देश असून शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकरी शेतीत पिकवून संपूर्ण देशातील जनतेची भूक भागवतो. भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचा जन्मदिवस म्हणून राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगितले. तर कृषिदूत रुपेश पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्राचार्य प्रविण वसावे, प्रा.शरद साठे, भिक्कन पाटील, जिजाबराव पवार, राजेश पाडवी, दिपक मराठे, जितेंद्र वानखेडे, भरत ठाकरे, रांझणीचे सरपंच अजय ठाकरे, शेतकरी कांतीलाल जांभोरे, सुनिल जांभोरे, कृषिदूत रुपेश पाटील, कृष्णकांत पाटील, कुणाल पाटील, गिरीश पाटील, शुभम उशीर, राकेश अडवल्ला, विनय मोर्थुल्ला, वेणु बाबु आदींसह विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन भिक्कन पाटील यांनी मानले.