नांदेड प्रतिनिधी जांबुवंत मिराशे/
१९ महिन्यापासून सुरू असलेल्या कायापालट या उपक्रमात भर पावसात धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमने रस्त्यावर फिरणाऱ्या ३६ भ्रमिष्टांची कटिंग दाढी केल्यानंतर स्नान घालून नवीन कपडे व शंभर रुपयाचे बक्षीसी दिल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
भाजपा महानगर नांदेड व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अन्नपूर्णा, अमरनाथ यात्री संघाच्या वतीने धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर हे राबवित असलेल्या कायापालट उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी राबविण्यात येतो. परंतु गेल्या आठवड्यात बालाजी मंदिर परिसरात गणेश उत्सव साजरा करण्यात येत असल्यामुळे दुसऱ्या सोमवारी हा उपक्रम घेण्याचे ठरले. सोमवारी सकाळपासूनच पाऊस सुरू असल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्याची वेळ आली होती. परंतु दिलीप ठाकूर यांनी सातत्य रहावे यासाठी पावसात उपक्रम घेण्याचे ठरविले. त्यानुसार लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा चे अध्यक्ष अरुणकुमार काबरा, मंगेश पोफळे , गायकवाड यांनी शहरातून फिरुन वेगवेगळ्या ठिकाणाहून भ्रमिष्ठांना दुचाकी वर बालाजी मंदिर परिसरात आणण्यात आले. स्वंयसेवक बजरंग वाघमारे यांनी सर्वांची कटिंग दाढी केली. स्नानासाठी स्वच्छ व मुबलक पाण्याची व्यवस्था बालाजी मंदिरचे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्यातर्फे करण्यात आली होती. कित्येक महिने अंघोळ न केलेल्या या भ्रमिष्टांना साबण लावून स्नान घालण्यात आले.स्वच्छ होऊन नवीन कपडे घातल्यामुळे त्यांच्या दिसण्यात अमुलाग्र बदल झाला होता . सर्वांच्या चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली.चार तास सुरु असलेल्या कार्यक्रमानंतर बालाजी मंदिरचा परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. गीता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष ॲड. चिरंजीलाल दागडिया, अन्नपूर्णाच्या कोषाध्यक्ष सविता काबरा, शिवनरेश चौधरी यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. भर पावसात कायापालट उपक्रम घेतल्याबद्दल दिलीप ठाकूर यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
असहाय्य असणारे कचरा वेचणारे, वेडे ,भिकारी, अपंग व्यक्ती आढळल्यास नांदेड शहरातील नागरिकांनी याची ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या रविवारी भाजप अथवा लायन्स सदस्यास माहिती द्यावी असे आवाहन संयोजक ॲड दिलीप ठाकूर यांनी केले आहे.