लवकर सरकार स्थापन करुन पूरग्रस्तांना मदत देण्याची केली मागणी
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीचे संकट कोसळले आहे. नांदेड जिल्ह्यातील वसमत परिसरात ढगफुटी झाल्याने नदीचे पाणी नदीपात्रातून गावांमध्ये शिरले. संपूर्ण गावाला पाण्याने वेढा घातला असून ऊस, सोयाबीनची पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने यात तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच घरांमध्ये पाणी शिरल्याने ग्रामस्थांसाठी जेवणाची, पिण्याच्या पाण्याची व जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील यांनी या भागाचा दौरा केला असताना केली.
आज नांदेड दौऱ्यावर असताना त्यांनी निळा, आलेगाव, एकदरा या गावांची पाहणी केली. राज्यात पूरपरिस्थितीने जनता संकटात असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेऊन पंधरा दिवस झाले. तरिही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, सरकार स्थापन झालेले नाही. लवकरात लवकर सरकार स्थापन करुन लोकांना तात्काळ मदतकार्य सुरू करावे, अशी मागणी मा. जयंत पाटील यांनी केली आहे.